क्रिकेट चाहत्यांची गैरसोय टाळा - मुख्यमंत्री शिंदे

04 Jul 2024 19:19:06
cm eknath shinde police administration
 

मुंबई :       टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हसह नरीमन पॉईंटपर्यंत चाहत्यांचा जनसागर उसळला आहे. टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर शहरात ओपन टॉप बसमधून विजय परेडचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनास निर्देश दिले आहेत.

दरम्यान, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाहतुकीचे कोणतेही गैरव्यवस्थापन किंवा गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मरीन ड्राईव्ह आणि आजूबाजूला योग्य गर्दी तसेच, वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत.


हे वाचलंत का? -    मरीन ड्राईव्ह-वानखेडेवर लोटला क्रिकेट फॅन्सचा अलोट सागर!


टीम इंडिया मुंबईत दाखल होण्याच्या कितीतरी वेळेआधीच सर्व चाहत्यांनी गर्दी केली. एवढंच नाही तर मध्येच पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतरही हे चाहते आपल्या जागेवरून हलले नाहीत. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विमानतळापासून तर मरीन ड्राईव्ह रस्त्यापर्यंत सर्व परिसर क्रिकेट प्रेमींनी गजबजलेला आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवरदेखील मुंबईकरांनी गर्दी केली आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर वादळात अडकलेला भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून मायदेशी परतला आहे. आज सकाळी टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर संपूर्ण टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियासोबत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर आता मुंबईतही टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0