मुंबई : कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर तेथील महापालिकेला स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्राची आवश्यकता होती. दरम्यान कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छतेसाठी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेल्या चमुमार्फत कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. यामध्ये वाहन चालक, तंत्रज्ञ, कामगार यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे. याठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे.
कोल्हापूर येथे पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त गगराणी यांच्या निर्देशानुसार प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभागाने कनिष्ठ अभियंता रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापूरकरीता दि. ३० जुलै रोजी रवाना केले. या चमुने कोल्हापुरातील शाहुपुरी या भागात काम सुरू केले आहे.
सन २०१९, २०२१ मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबईमहानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.