मुंबई : उत्तर मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दि. २८ जुलै रोजी कांदिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी आणि हरिलाल भगवती रुग्णालयाची पाहणी केली. तसेच भगवती रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. तसेच रुग्णांना योग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही गोयल यांनी दिले.
दहिसरमधील हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी लांब जावे लागते. त्यातच शताब्दी रुग्णालयातील उपकरणे नादुरुस्त, शस्त्रक्रिया विभाग सेवा बंद, औषध उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यामुळेच या सर्व तक्रारींची दखल घेत गोयल यांनी रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णालयातील तपासणी यंत्रणा,वॉर्ड,शस्त्रक्रिया कक्ष आदींना भेट देऊन रुग्णालयात नागरिकांना सोईसुविधा उपल्बध करून देण्यासंदर्भात उपाययोजना सूचवल्या. याबाबत रुग्णालय व्यवस्थापक मंडळ,डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. यावेळी दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी, उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.