नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून टीका करणाऱ्यांना मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी खडेबोल सुनावले आहेत. आमच्या बहिणी काही ॲमेझॉनमधून खरेदी करणाऱ्या नसतात. तर त्या आपल्या जवळपासच्या बाजारातून खरेदी करतील. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "अर्थ विभागाने लाडकी बहीण योजनेबाबत चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येत असताना ती वित्त विभागाकडूनच जाते. जेव्हा वेतन आयोग देतो तेव्हा ४४ हजार कोटी रुपयांचा भार आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो. १७-१८ लक्ष कर्मचाऱ्यांसाठी भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था अडचणीत येत नाही. मात्र, २ कोटी ४८ लक्ष बहिणींना तेवढेच पैसे दिल्यावर वित्तीय व्यवस्था अडचणीत येते. हे कोणतं अर्थशास्त्र आहे?" असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलंत का? - "अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह करप्ट!"
ते पुढे म्हणाले की, "जेव्हा २ कोटी ४८ लाख गरीब महिलांकडे हे पैसे जातील तेव्हा ती बाजारात जाऊन आवश्यक गोष्टींची खरेदी करेल. त्यामुळे बाजाराच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. कारण आमच्या बहिणी काही ॲमेझॉनमधून खरेदी करणाऱ्या नसतात. तर त्या आपल्या जवळपासच्या बाजारातून खरेदी करतील. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पण महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची सुप्त ईच्छा असणारे लोकच असं बोलू शकतात," असेही ते म्हणाले.