नागपूर : अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव हे येत्या विधानसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचा प्रचार करणार आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकशाही धोक्यात असल्यामुळे विधानसभेत इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दोन दिवसांपूर्वी श्याम मानव यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, त्यानंतर तुम्ही ईडीच्या प्रकरणातून सुटाल, असा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टाकण्यात आल्याचा दावा केला होता. यावरून त्यांच्यावर अनेकांकडून टीकाही करण्यात आली होती. दरम्यान, आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे वाचलंत का? - "काँग्रेस-राष्ट्रवादीने बिस्कीट फेकल्यानंतर..."; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल
श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्याम मानव मला इतके वर्ष ओळखतात. त्यामुळे त्यांनी असे आरोप करण्याआधी पहिल्यांदा मला विचारायला हवं होतं. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात इकोसिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसलेले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागलेत का? असा प्रश्न पडतो आहे." दरम्यान, श्याम मानव यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर फडणवीसांवरील आरोप हे खरंच एक षडयंत्र आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.