नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन सुरू केले. भाषणाच्या सुरूवातीला निर्मला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी दिल्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाळ्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमच्या धोरणांवर जनतेने विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
भाषणाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या नऊ प्राधान्यक्रमांची यादी दिली. यामध्ये त्यांनी शेतीतील उत्पादकता वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यासोबतचं रोजगार आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवणार असल्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले. त्यासोबतच समग्र मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी! काय घडणार?
पुढे बोलताना निर्मला सीतारामन यांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्राला मदत करण्याची सुद्धा घोषणा केली आहे. त्यासोबतच शहर आणि नागरी विकासवर सुद्धा सरकार भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासोबतच देशाची उर्जा सुरक्षा आणि उर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मागच्या १० वर्षात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भांडवली खर्च केला. भविष्यातही पायाभूत सुविधा विकासावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच पुढच्या पिढीसाठी नवोपक्रम, संशोधन आणि विकासवर सरकार भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.