मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Chintan Baithak) भगवान जगन्नाथाच्या पवित्र भूमीत ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होणाऱ्या धर्मांतराच्या कार्यांवर आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आयोजित संत चिंतन बैठकीमध्ये संतांनी केली आहे. गुरुवार, दि. ११ जुलै रोजी जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी येथे सदर चिंतन बैठक पार पडली. स्वामी जीवनमुक्तानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परमहंस स्वामी प्रज्ञानानंद आणि स्वामी शंकरानंद यांसारखे दोनशेहून अधिक नामवंत संत उपस्थित होते.
हे वाचलंत का? : ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ ठरणार महायुती सरकार!
विहिंपचे क्षेत्र सहमंत्री गौरी प्रसाद रथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतन बैठकमध्ये ओडिशातील सर्रासपणे होणारी गोहत्या आणि गाईची तस्करी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतांनी चिंता व्यक्त केली. ओडिशामध्ये गोहत्या थांबवण्यासाठी ओडिशा गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू आहे असे संतांचे मत होते. यासोबतच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदाही राज्यात लागू आहे. गायींच्या वाहतुकीबाबतही कायदे आहेत. मात्र दुर्दैवाने या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच राज्यात गोहत्या आणि गो तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी संतांनी केली आहे.
चिंतन बैठकमध्ये संतांनीही राज्यातील ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून होत असलेल्या धर्मांतराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. संतांनी सांगितले की, बेकायदेशीर धर्मांतरं रोखण्यासाठी कायदा करणारे ओडिशा हे पहिले राज्य आहे. मात्र, प्रशासनाकडून या कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे धर्मांतराच्या घटना वाढत आहेत. ते म्हणाले की, सरकारने या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि लोकांचे बेकायदेशीरपणे धर्मांतर करणाऱ्या मिशनऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी संतांची मागणी आहे. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीचाही संतांनी पुनरुच्चार केला.