नॅशनल पार्कातील आदिवासी पाड्यांना वीज मिळण्यासाठी उपाययोजना करावी

11 Jul 2024 14:08:36

Pravin darekar
 
मुंबई: मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मात्र आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबई शहरात नॅशनल पार्क मधील आदिवासी पाडे आजही विजेविना राहत आहेत, हे दुर्दैव असून शासनाने याबाबत उपाययोजना करावी, अशी विनंती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आज सभागृहात सदस्य राम शिंदे यांनी पंतप्रधान सूर्यघर योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
 
त्या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर म्हणाले की, नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाडे आहेत त्याठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे किंवा वनविभाग असल्याने त्यांना विजेचे कनेक्शन देता येत नाही. त्या १६ आदिवासी पाड्यांना मोकळ्या जागेत सौरऊर्जा यंत्रणा बसवली तर त्या गरीब आदिवासींना वीज पोहोचेल. कारण आजही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात आदिवासी विजेविना राहताहेत हे दुर्दैव आहे.
 
त्यादृष्टीने सूचना देऊन शासनाने उपाययोजना करावी, अशी विनंती दरेकरांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात स्पेशल केस म्हणून आदिवासी पाड्यांना विजेची जोडणी दिली. मात्र त्यावर वनविभागाने आक्षेप घेतला. हे सातत्याने सुरू असते. दरेकर यांच्या सूचनेतील व्यवहार्यता तपासून घेतली जाईल आणि ती सूचना व्यवहार्य असेल तर निश्चितपणे उपाययोजना केली जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0