खड्डे दुरुस्तीसाठी प्रशासनाची त्रिसुत्री - सर्व यंत्रणा एकत्रित काम करणार

10 Jul 2024 19:22:50

thane  
ठाणे : दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना यंत्रणांची तारांबळ उडते. तेव्हा, ‘रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने सर्व यंत्रणांनी काम करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या स्वप्नील मंहिंद्रकर यांनी घोडबंदर रस्त्याच्या खड्डयाबाबत आयुक्तांना सचित्र निवेदन दिले होते. पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत: घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या
बैठकीत, ठाणे पालिकेच्या नगर अभियंता व अधिकाऱ्यासह मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. आनंद नगर, चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे.
 
त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला. या बैठकीत, घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनि:सारण वाहिनीचे काम, नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंद नगर चेक नाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजना याबद्दल चर्चा झाली.
 
Powered By Sangraha 9.0