नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेस पक्ष तीन अंकी आकडाही गाठू शकला नसला तरी निवडणुकीत राहुल गांधींनी मालमत्ता वाटपासह अनेक मोठी आश्वासने दिली. आता उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर मुस्लिम महिलांची मोठी रांग लागली आहे. हे सर्वजण एक लाख रुपयांची मागणी करत असून, त्यांना आर्थिक लाभ द्या, असेही ते सांगत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता एनडीए व इंडी आघाडीत सत्तास्थापनेसाठी चुरस रंगली आहे. काँग्रेसकडून यंदाच्या निवडणुकीत आश्वासनाची खैरात करण्यात आली त्यानुसार मुस्लीम महिला हातात 'गॅरंटी कार्ड' घेऊन उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या आश्वासनानंतर आता मुस्लिम महिला आपली ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन पक्ष कार्यालयात पोहोचल्या आहेत. या महिलांच्या हातात काँग्रेसचे 'गॅरंटी कार्ड'ही आहे, ज्यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक लाख रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले आहे. या हमीपत्रात कर्जमाफीचे आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, तस्लीम नावाच्या महिलेने सांगितले की, तिला काँग्रेस कार्यालयाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. अनेक फॉर्म जमा झाले असून त्यांना स्लिपही देण्यात आली आहे. अनेक महिलांनी त्यांना कार्ड मिळाले नसल्याचे सांगितले तसेच, अनेकांना दुपारी येण्यास सांगितले. मुस्लिम महिलांनीही ही कार्डे भरली असून अनेकांची रक्कम जमा होत नसून ही प्रदीर्घ प्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे.