नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीमध्ये देशाला नवी दृष्टी दिली आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल काय असेल, याचा निर्णय इंडी आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने चमकदार कामगिरी करून जवळपास २३१ जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यामध्ये काँग्रेसला ९८ जागांवर विजय मिळाला असून २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत काँग्रेसचा कामगिरी सुधारली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीदेखील उपस्थित होत्या.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, इंडी आघाडीस २३१ जागा प्राप्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पुढील राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी इंडी आघाडीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये चर्चा केली जाणार असून सध्या रालोआमध्ये असलेल्या इंडी आघाडीच्या जुन्या साथीदारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नियंत्रणाच्या राजकारणाविरोधातील या लढाईत जनतेने काँग्रेसला दिलेला जनादेश महत्त्वाचा ठरत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे जनतेचा विजय असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यावेळी कोणत्याही एका पक्षाला जनतेने बहुमत दिलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. भाजप नेतृत्वामध्ये अहंकार होता तर इंडी आघाडीने एकजुटीने प्रचार केल्याचेही खर्गे यांनी यावेळी नमूद केले आहे.