नवी दिल्ली : १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी
मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालानुसार एनडीए तिसऱ्यांदा सत्तास्थापन करता येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच, प्रमुख विरोधक असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड व रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे एक्झिट पोलनुसार एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, मतमोजणीनुसार आलेल्या निकालानंतर एक्झिट पोलचा अंदाज चुकल्याचे पाहायला मिळाले.
इंडी आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दुपटीने यश आले असून इंडी आघाडीस एकूण २०० हून अधिक म्हणजेच २३५ जागांवर विजय मिळविता आला आहे. इंडी आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाला ९९ जागा जिंकता आल्या आहेत. त्याचबरोबर, विशेषतः महाराष्ट्रात महायुती विरुध्द मविआ (महाविकास आघाडी) अशी लढत पाहायला मिळाली.
राज्यात काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून त्यानंतर उबाठा गटास ०९ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने चमकदार कामगिरी करून जवळपास २३१ जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यामध्ये काँग्रेसला ९८ जागांवर विजय मिळाला असून २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत काँग्रेसचा कामगिरी सुधारली आहे.