मुंबई : सकाळपासूनच लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यातील पहिल्या लोकसभेचा निकाल समोर आला आहे. उत्तर मुंबई लोकसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायूतीकडून भाजपचे पीयूष गोयल हे उमेदवार होते. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली होती. उत्तर मुंबईमध्ये विरोधी पक्षांपैकी कोणीही लढण्यास तयार नसताना, ठाकरेंनी मोठ्या शिताफीने ही जागा काँग्रेसच्या गळ्यात मारली आणि अंग काढून घेतले. अशावेळी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, मालाड पश्चिमेपासून दहिसरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात अनोळखी उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदारही संभ्रमात पडल्याचे बोलले जात होते.
हे वाचलंत का? - नारायण राणेंचा विजय निश्चित! विनायक राऊतांना आस्मान दाखवणार!
दरम्यान, आता मतदारांनी पीयूष गोयल यांना आपला कौल दिला असून ते विजयी झाले आहेत. पीयूष गोयल यांना ३ लाख ४५ हजार ७०९ मतं मिळाली तर भूषण पाटील हे १ लाख ६७ हजार ५०३ मतांनी पिछाडीवर होते. याचाच अर्थ पीयूष गोयल हे १ लाख ७८ हजार २०६ मतांनी विजयी झाले आहेत.