मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान १ जून रोजी संपन्न झाले. त्यानंतर आता लोकसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काहीच तास उरले असून जनतेने कुणाला कौल दिलाय हे लवकरच कळणार आहे. त्यामुळे या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
राज्यात यंदा महायूती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. या लढतीत कोण बाजी मारणार हे उद्या म्हणजेच ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. शिवाय निकालाच्या आधीच ठिकठिकाणी अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनरही झळकले आहेत.
हे वाचलंत का? - ब्रेकिंग न्यूज! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
यावर्षीच्या निवडणूकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शनिवारी निकालाचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. यातील अनेक एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायूतीचीच सत्ता येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, उद्या सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून राज्यात पुन्हा महायूतीचे सरकार येणार की, महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.