"१५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ओवेसीला कळणार नाही, कुठून आला आणि कुठे गेला"

09 May 2024 12:14:48
 rana
 
हैदराबाद : महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी दि. ८ मे २०२४ रोजी हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदूंना १५ मिनिटांमध्ये संपवण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसीला चांगलेच उत्तर दिले.
 
नवनीत राणा म्हणाल्या की, “एक लहान भाऊ आहे, एक मोठा भाऊ आहे. धाकटा (अकबरुद्दीन ओवेसी) म्हणतो की जर तुम्ही १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आम्ही दाखवू की तो काय करू शकतो. मी धाकट्याला म्हणतो की तुला १५ मिनिटे लागतील आणि आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. जर १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर त्याला तो कुठून आला आणि कुठून गेला हे कळणार नाही.”
 
 
 
राणांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप अनेक ठिकाणी व्हायरल झाली आहे. एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी पक्षाचे प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले की, राणा यांचे हे विधान निवडणुक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करते कारण यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, वारिस पठाणने जर नवनीत राणांसारखे भाषण केले असते तर तो तुरुंगात गेला असता. अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांत पोलीस मागे घेण्याचे वक्तव्य दिल्यानंतर स्वत: शरणागती पत्करली होती. ४०-४२ दिवस ते तुरुंगात होते. दहा वर्षे कोर्टात लढले आणि निर्दोष सुटले. नवनीत राणा यांच्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार आणि त्यांना कधी तुरुंगात पाठवणार? मुस्लिमांच्या विरोधात दररोज विधाने केली जातात पण कारवाई होत नाही, असा आरोपही त्यांनी लावला.
 
Powered By Sangraha 9.0