मुंबई : राज्यात सोमवारी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान पडले. मात्र, यादरम्यान, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सोमवार, २० मे रोजी लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाकडून जाणूनबूजून संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर आता आशिष शेलारांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.