त्यावेळी भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर...; शरद पवारांचं विधान

19 May 2024 11:55:15

Pawar & Bhujbal 
 
मुंबई : २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती, असेही ते म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
शरद पवार म्हणाले की, "त्यावेळी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार नव्हता. अजित पवार तेव्हा नवखे होते. छगन भूजबळांतं नाव होतं पण त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपद न घेण्याचा निर्णय घेतला," असे ते म्हणाले.
 
२००४ मध्ये सर्वात जागा जिंकल्या असतानाही शरद पवारांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसल्याने मुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रीपद जास्त घ्यायचे असा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, सोमवारी लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधी शरद पवारांनी एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0