मुंबई (विशेष प्रतिनिधी): चंद्रपुर मानवी हल्ल्यांची नोंद असलेल्या एका वाघाच्या बछड्याला जेरबंद करण्यात आलंय. तीन माणसांवर हल्ला करून त्यांना ठार केलेल्या एका वाघिणीच्या बछड्याला शनिवार दि. १८ मे रोजी जेरबंद करण्यात आले.
चंद्रपुरच्या खडसंगी बफर क्षेत्रातील निमढेला उपक्षेत्रामधील जवळपासच्या गावांमध्ये भानूसखिंडी नावाच्या वाघिणीच्या या बछड्याने सुर्यभान हजारे, रामभाऊ हनवते आणि अंकूश खोब्रागडे या तीन व्यक्तींवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये हे तिघेही ठार झाल्याची माहिती देण्यात आली असून मानवी हल्ले करणाऱ्या या वाघाच्या बछड्याला पकडण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा बफर क्षेत्र उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक्षक वाठोरे यांच्या मार्गदर्शनांतर्गत रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी ११ च्या सूमारास भानूसखिंडीच्या बछड्याला पकडण्यात आले आहे. वनविभागासमवेत या संपुर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलीस नाईक ए.सी. मराठे, राकेश अहूजा, दिपेश टेंभुर्णे व इतर वनअधिकारी उपस्थित होते. या वाघाची प्रकृती ठिक नसून त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथे नेण्यात आले आहे.