पुणे : लोकसभा निवडणूकीच्या काळात उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. आदित्य ठाकरेंना पत्र लिहित त्यांनी आपले राजीनामे दिलेत. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे हे राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असून राज्यभर जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, अशातच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. पुण्यातील युवासेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना पत्र लिहीत राजीनामे दिले आहेत.
हे वाचलंत का? - मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर उबाठा गटाचा भ्याड हल्ला!
"आम्ही युवासेना वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. परंतू, वेळोवेळी पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला घाणेरडी वागणूक दिली गेली. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी पैशाची मागणी केल्याने आम्ही सामूहिक राजीनामा देत आहोत," असे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.