मुंबई : मानखुर्दला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देणार, असे आश्वासन ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी दिले आहे. शुक्रवारी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उबाठा गटावर निशाणा साधला.
मिहीर कोटेचा म्हणाले की, "आम्ही सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शिवाजी पार्कला निघाल्यानंतर मानखुर्दचे नवाब संजय पाटील तुमचे गुंड मुस्ताक खान आणि इतर लोकांनी माझ्या वॉररुमवर हल्ला केला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे."
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरेंना हिरवा झेंडा आवडतो, भगव्याला फडकं म्हणतात!
ते पुढे म्हणाले की, "मी निवडून आल्यावर तुमचे सर्व काळे धंदे, ड्रग्जस गुटखा हे बंद करणार आणि मानखुर्दचे नाव छत्रपती शिवाजी नगर करणारच. त्यामुळे मुंबईकरांना आता ठरवायची वेळ आलीये की, लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचा की, तुमचा सेवक पाठवायचा आहे?" असेही ते म्हणाले.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायूतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्याआधी मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यानंतर मिहीर कोटेचा यांनी संजय दिना पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.