भगवान बिरसा मुंडा यांचा पणतू आणि अल्बर्ट एक्का यांच्या सूनेचा पंतप्रधान मोदींना पाठींबा, म्हणाले...
18 May 2024 12:46:38
मुंबई (प्रतिनिधी) : भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांचे पणतू सुखराम मुंडा आणि हुतात्मा अल्बर्ट एक्का यांची सून रजनी एक्का यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये या दोघांनीही आपलं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच असल्याचे म्हटले आहे. या दोघांचाही पंतप्रधान मोदीना पाठींबा असल्याचे यावरून दिसते आहे.
वनवासी समाजातून आलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी या राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता. त्याचप्रमाणे, परमवीर चक्र प्राप्तकर्ता अल्बर्ट एक्का हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात हौतात्म्य पत्करले होते. गेल्या ७० वर्षात त्यांना पुरेसा सन्मान मिळाला नाही, मात्र पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांना तोच सन्मान मिळाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून पंतप्रधान मोदींप्रती कृतज्ञता व्यक्त करत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुखराम मुंडा म्हणाले की, वनवासी समाजातील भगवान बिरसा मुंडा यांना मोदी सरकारमध्ये जेवढा आदर मिळाला तो यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करतील. यासोबतच शहीद अल्बर्ट एक्का यांची सून रजनी एक्का म्हणाल्या की, त्या स्वतः कॅथोलिक ख्रिश्चन आहे आणि तिला याचा अभिमान आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही भेदभाव न करता एका बेटाचे नाव देऊन परमवीर चक्र प्राप्त अल्बर्ट एक्का यांचा गौरव केला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी तसेच संपूर्ण झारखंडसाठी ही अभिमानाची बाब आहे."
शौर्य दिनाच्या दिवशी (२३ जानेवारी २०२३) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या २१ सर्वात मोठ्या अनामित बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली होती. यापैकी एका बेटाला परमवीर चक्राने सन्मानित लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांचे नाव देण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा हे वनवासी समाजातून आले होते. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश वसाहतवादी व्यवस्थेच्या विरोधात देशभरात शौर्याने लढा दिला आणि क्रांती पुकारून ब्रिटीश दडपशाही विरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजेच १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.