लखनौ : बरेली येथील रुबिना सय्यद नावाच्या महिलेने सनातन धर्मात घरवापसी केली आहे. सनातन धर्मात घरवापसी करणाऱ्या रुबिना सय्यदने आपले नाव बदलून प्रीती ठेवले आहे. तसेच तिने तिचा प्रियकर प्रमोद कश्यप याच्याशी पूर्ण विधीपूर्वक लग्न केले आहे. रुबिना ही वृंदावनची रहिवासी आहे. तिचे पूर्वी लग्न झाले होते, तिला दोन मुले होती, परंतु तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आणि सहा महिन्यांपूर्वी तिला घरातून हाकलून दिले. यानंतर ती प्रमोदच्या संपर्कात आली आणि आता प्रीती बनली आहे.
प्रीती म्हणते की ती मुस्लिम असल्यामुळे तिला छळाचा सामना करावा लागला आणि तिहेरी तलाक सारख्या क्रूर प्रथेला सामोरे जावे लागले कारण इस्लाममध्ये महिलांचा आदर नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवार, दि. १५ मे २०२४ बरेली येथील अगस्त्य मुनी आश्रमात सनातन स्वीकारणाऱ्या प्रीतीचे जुने नाव रुबीना होते.
बरेली येथील आचार्य के के शंकधर यांनी त्यांना गोमूत्र आणि गंगाजलाने शुद्ध केले आणि त्यानंतर प्रीती आणि प्रमोद सात जन्मांच्या बंधनात बांधले गेले. प्रीतीने सांगितले की, तिची सुरुवातीपासूनच हिंदू धर्मावर श्रद्धा आहे. तिला हिंदू धर्म आवडतो. सुमारे १५ दिवसांपूर्वी ती घरातून निघून गेली होती. आता ती पतीसोबत राहणार आहे. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात.
प्रीती म्हणाली की, इस्लाम धर्मात महिलांचा कोणीही आदर करत नाही. तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या वाईट प्रथा प्रचलित आहेत. मी स्वेच्छेने घरवापसी केली आहे आणि हिंदू प्रथेनुसार सनातन धर्म स्वीकारला आहे.