बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्यांवर आता जनतेचा विश्वास नाही!

16 May 2024 20:34:33
Sudhir Mungantiwar on UBT

मुंबई :
जनादेशाचा अवमान करून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त्यांनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल देशाने अनुभवली आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतलेली ‘मशाल’ ज्यावेळी पंज्याचा प्रचार करायला लागली त्याचवेळी जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला. आता भारतीयांचा विश्वास देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर आहे, या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे टॉवर असलेल्या मोबाईलमध्ये ‘कमळ’ चिन्हाचे सिमकार्ड टाकून डॉ. हेमंत सावरा यांना निवडून द्या, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी पालघर येथे आयोजित मेळाव्यात केले.
 
सातपाटी जिल्हा पालघर येथे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करीत होते. यावेळी, आमदार रमेश पाटील, देवराव होळी,लोकसभा मतदार संघ प्रभारी श्रीमती राणी द्विवेदी,सुनील सिंह, देवराजजी, जिल्हा संगठन महामंत्री संतोष जनाठे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक,राजन मेहेर, सीमाताई भोईर, अशोक हंभिरे, प्रमोद आरेकार, गीतांजली सावे, विनोद नाईक, रुपेश म्हात्रे, कोमल जोशी, आश्विनी तरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण आणि तडफदार भाषणात सुधीर मनगंटीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या विविध विकास व कल्याणकारी योजनांचा आढावा घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या इंडीया आघाडी कडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही.केवळ निवडणूकीपुरते मतदारांसमोर जाऊन मायावी पद्धतीने भुरळ घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करताहेत ; सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला विकासाच्या बाबतीत भाजपला प्रश्न विचारण्याचा मुळात अधिकारच नसून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या विकासाचा झंझावात देशाच्या जनतेने अनुभवला आहे. एक नंबर स्वतःच्या मूळ विचारांना बगल देत, काँग्रेससाठी प्रचार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी आहे; त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध उचललेला धनुष्यबाण त्यांना पराभूत करणार आहे. महागाईच्या नावावर जनतेला भ्रमित करणाऱ्या काँग्रेस पक्षाने कायम तळागळातील माणसांची उपेक्षा केली आहे.

श्रीनगरच्या लाल चौकात विमानाने तिरंगा फडकवण्याची हिंमत आज मोदी सरकारमुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये आली आहे. या देशाचा गौरव वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, ही लढाई विकास विरुद्ध विनाश प्रगती विरुद्ध अधोगती अशा पद्धतीने सुरू असून मतदारांनी देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन देखील मुनगंटीवार यांनी यावेळी केले.माजी मंत्री व डॉ. हेमंत सावरा यांचे वडील कै. विष्णू सावरा यांची आठवण करत अत्यंत संवेदनशील, सहिष्णू आणि सौजन्यशीलतेने काम करणारा नेता असा उल्लेख ना. मुनगंटीवार यांनी त्यांच्या बाबतीत करून पालघरची जनता नक्कीच डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.


Powered By Sangraha 9.0