मुंबई : समस्या घेऊन येणाऱ्या लोकांसाठी दारं बंद करायची आणि खिडीतून मजा बघायची असं तुमच्यासारखं घरकोंबडं नेतृत्व आमचं नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "काल मोदीजींच्या रोड शोला मुंबईकरांचा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाल्याने विरोधकांच्या पोटात दुखलं. सकाळी ९ चा भोंगा म्हणाला की, आम्ही पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं. पण लोकांची सुख-दु:ख समजून घ्यायला रस्त्यावरच यावं लागतं हे तुम्हाला काय माहिती?"
हे वाचलंत का? - ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा आणि शरद पवार गट फुटणार!
"आमचं नेतृत्व हे जनतेच्या सुखदु:खाशी एकरुप होणारं नेतृत्व आहे. त्यामुळे ते नेहमी २४ बाय ७ रस्त्यावर आणि जनतेमध्ये असतं. तुमच्यासारखं समस्या घेऊन येणाऱ्या लोकांसाठी दारं बंद करायची आणि खिडीतून मजा बघायची असं घरकोंबडं नेतृत्व आमचं नाही. काल मुंबईच्या रस्त्यावर फक्त गर्दी ओसंडून वाहत नव्हती तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मोदींवर बरसत होता. मुंबईकर जनतेचा विश्वास कालच्या गर्दीतून दिसत होता. हा देश फक्त मोदींजींच्या हातात आणि महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या हातात सुरक्षित हे दिसत होतं," असेही त्या म्हणाल्या.
बुधवार, १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याणमधील सभेनंतर घाटकोपर येथे रोड शो झाला. या रोड शोवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी टीका केली होती. दरम्यान, आता ज्योती वाघमारेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.