मायबोलीची आठवण येते म्हणून पुस्तक वाचलेला विजय जेव्हा पुस्तकांचेच दुकान थाटायचे ठरवितो आणि केवळ ३ वर्षांत यशस्वी होतो. त्या विजयचा प्रवास सांगणारा हा लेख..
साधारण दोन वर्षांपूर्वी विजय कोलकातामध्ये नोकरी करत होता. सोशल मीडियावर एक पुस्तक तेव्हा गाजत होते. त्याचे अभिप्राय वाचनात आले आणि दुसरीकडे मातृभूमीची आणि मातृभाषेची आठवण. अवांतर वाचनाची वगैरे सवय नव्हतीच. पण तरीही मागवले, वाचले आणि मग मात्र पुस्तक काय असते, याची पुरेपूर प्रचिती त्याला आली. उत्कंठा शिगेला पोहोचलेली अवस्था, त्यानंतर वाचन आणि मग त्या पुस्तकाने भारावून जाणे, या एका घटनेने त्याच्या आयुष्याला वळण मिळाले. मुंबई किंवा पुण्यात आता नोकरी धरायची, महाराष्ट्रापासून फार दूर राहायचे नाही, या हेतूने नोकरी सोडली आणि तो मुंबईत आला. त्यानंतर, तीन महिने त्याने स्वतःसाठी दिले होते.
लहानपणी कल्याणजवळ आईबाबांसोबत मोठा झालेला विजय,नोकरी करू लागल्यानंतर काही काळाने त्याच्या आईवडिलांनी कल्याणचे घर विकून, गावी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा त्याला घर नव्हते. जवळच एक खोली घेऊन तो राहू लागला. डोक्यात वाचलेल्या पुस्तकाचे विचार होतेच. ‘सलग पाच वर्षे कामानिमित्त ‘आवडते शहर’ सोडून पुणे, इंदोर, कोलकाता, बिकानेरमध्ये घालविलेली असल्याने आयुष्य गंडलं होतं’ असे तो म्हणतो. आपल्या डोक्यावर कोणाचा तरी हात, वरदहस्त असल्यावर आपण एका ‘कम्फर्ट झोन’ मध्ये जगत असतो, अगदी तसे दिवस चालू होते. कम्फर्ट झोनच्या बाहेर येणे गरजेचे वाटत होते. आणि याचवेळी त्याने हा निर्णय घेतला.
या तीन महिन्यांच्या सुट्टीत मुंबईत घर घेण्याची खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती. त्याच काळात खूप सहली, खूप सारे मित्र, आठवणी जमा करता आल्या. जणु काही, तुरुंगातून परतून आल्यासारखे दिवस होते ते, मंतरलेले! अर्थात, त्यावेळी मुंबईत जॉब शोधण्याचे प्रयत्न सुरूच होते. एके ठिकाणी नोकरी मिळालीही आणि सुरुवातही केली. अवघ्या तीन महिन्यांत घरून काम करण्यासाठी परवानगी मिळाली. थोडेसे स्थिर झाल्याचे समजताच, वाचन पुन्हा सुरू झाले. शैक्षणिक जडणघडण डोळ्यांसमोर उभी राहिली. ’शिकायचे म्हणून शिकलेले’ दिवस आठवू लागले, आणि आयुष्याचा सगळा पटच डोळ्यांसमोरून गेला. आपण सपशेल हरलो आहोत, हे जाणवले. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत केवळ व्यवहार शिकलेलो असतो.
या सर्वात आपल्या सामाजिक जाणीवेचे स्थान कुठे? या प्रश्नाने पछाडलेला विजय मग वाचलेली आवडती पुस्तके आपल्या मनात भिनवू लागतो. आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपल्याला आवडलेली पुस्तके पोहोचविता यासाठी त्याचे प्रयत्न सुरु झाले, आणि अशातच प्रकाशकांशी तो बोलला. पुस्तकांशीच संबंध नसलेल्या विजयचा असा प्रकाशकांशी आणि व्यावसायिकांशी संबंध आला. मनात होत्या फक्त सामाजिक जाणीवा. प्रकाशकांकडून घेतलेल्या किंमतीत जवळपास ७० ते ८० लोकांपर्यंत पुस्तक पोहोचविले. ह्याचवेळी, मित्रांनी त्यांच्या यादीतल्या पुस्तकांची मागणीही केली. हा होता, उघडलेला पहिला दरवाजा. ओळख नसलेला, पलिकडच्या विश्वाची माहिती नसलेला, पण तरीही आव्हानात्मक वाटेल, असा पहिला. फेसबुकवरून पोस्ट शेअर केल्यावर एका महिलेने पुस्तक मागविले. प्रकाशकांकडून मिळवून तेव्हा त्याने ते दिले. हे सर्व नोकरी सुरू असताना चालू होते. पुस्तके मागवायची आणि पोस्टाने पाठवायची. या बाई म्हणजे यदुनाथ थत्ते यांच्या सून!
लहानपणी पाठ्यपुस्तकात यदुनाथ थत्ते यांचे धडे असल्याने नाव माहीत होते. बोलणे सुरू असताना त्यांनी थत्ते कुटुंबियांची माहिती दिली. त्यांचा मुलगा अमेरिकेवरून सुट्टीसाठी भारतात आला होता. त्यानिमित्ताने त्यांनी विजयलासुद्धा पुण्यात बोलावले. सुट्टीचा दिवस असल्याने विजय दोन दिवस पुण्यात गेला. दोन दिवसांच्या भेटीत खूप गप्पा करता आल्या. त्यावेळी, त्यांनी खास विजयासाठी काही पुस्तके, आणखी खूप काही भेटवस्तू घेऊन ठेवलेल्या होत्या. आयुष्यातले हे ‘पहिलं गिफ्ट’ होते विजयासाठी.
पुण्यावरून परतल्यावर पुन्हा कामाची सुरुवात झाली. यावेळी मात्र आयुष्यात पुस्तकांची किंमत वाढलेली होती. फोन मध्ये ‘वाचणार्या’ लोकांची यादी वाढत होती. थोडक्यात, वाचक जमविण्याचा छंदच विजयला लागला. नोकरी करतानाच लेखक-प्रकाशक-वाचक ही साखळी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. कुठली पुस्तके कमी-जास्त वाचली जातात, महाराष्ट्रात कुठल्या भागात कमी-जास्त पुस्तके पोहोचतात, याचा अभ्यास केला. वाणिज्याची पार्श्वभूमी असल्याने या सर्व गोष्टी आपोआप लक्षात येत होत्या. त्यासोबत जोडली गेलेली वैचारिक मित्रमंडळी, इतर ठिकाणच्या कामाचा वेगवेगळा अनुभव, ग्राफिक्स डीझाईनचे ज्ञान, जुन्या मित्रांची पुन्हा मिळत असलेली साथ या सर्वांच्या जोरावर ‘स्पर्श’ नावाने पुस्तकांचे ऑनलाइन दुकान चालू केले.
नोकरी सांभाळत असतानाच कुठल्याही अधिकच्या मार्केटिंगशिवाय महाराष्ट्रातल्या १ हजार, ८०० वाचकांपर्यंत विजयला पोहोचता आले. वाचकांच्या संदर्भाशिवाय नवीन वाचकांपर्यंत पोहोचणे तसे कठीण असते. ही संदर्भपद्धती जगातल्या कुठल्याही मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगपेक्षाही जास्त प्रभावी असते. शेवटी सहानुभूती मिळविण्यापेक्षा तुम्ही पुरवत असलेली सेवा तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. शिवाय, त्यासोबत तुमचा आत्मविश्वास वाढवत असते. एक एक वाचक जोडताना त्याची मानसिकता अभ्यासली. प्रत्येक वाचकाला एक गोष्ट असते ती समजत गेली. आज संपूर्ण ऑनलाईन दुकान चालविणारा विजय केवळ पुस्तकांच्या व्यवसायात आहे. नोकरीला त्याने केव्हाच रामराम ठोकला! त्यांच्यापुढील वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!