"त्यांनी माझ्याबद्दल हातावर लिहून आणलं होतं कारण..." निर्मिती सावंत झाल्या भावूक
24-Apr-2024
Total Views |
३० एप्रिल २००० रोजी निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असणारं 'जाऊबाई जोरात' नाटक रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाला ३० एप्रिल २०२४ रोजी २४ वर्ष पुण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधत निर्मिती सावंत यांचं 'आज्जीबाई जोरात' हे नवं कोरं AI महाबालनाट्य भेटीला येत आहे.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ‘कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक’ किंवा मग ‘जाऊबाई जोरात’; मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही मनोरंजनाच्या माध्यमातून रंजक कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत (Nirmiti Sawant). आज्जीबाई जोरात या महाबालनाट्याच्या निमित्ताने निर्मिती सावंत पहिल्यांच आजीबाईंची भूमिका साकरणार आहेत. पण आजवर अनेक भूमिका गाजवणाऱ्या आणि विनोदातून आपल्याला हसवणाऱ्या निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) ‘महाएमटीबी’शी बोलताना एक किस्सा सांगताना भावूक झाल्या.
निर्मिती सावंत म्हणाल्या की, "श्यामची मम्मी हे गाजलेलं नाटक. त्याचा आनंदवनला प्रयोग होता. त्याकाळात निर्मिती सावंत हे नावं बऱ्यापैकी लोकप्रिय झालं होतं आणि लोकांना माहित होतं. तर माझा श्यामची मम्मीचा प्रयोग झाला आणि मला निरोप आला की मुलं मला भेटायला थांबली आहेत. मी काहीवेळाने त्यांना भेटायला गेले. तेव्हा माझ्या डोक्यात हे पक्क होतं की कसं माझं काम चांगलं झालं, त्यांना भूमिका आवडली ही सगळी वाक्य कानांवर पडतील. पण ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेले त्या मुलांनी माझ्याबद्दल हातावर लिहून आणलं होतं कारण ती मुलं मुकी होती. त्यावेळी माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि आपलं काम किंवा आपली कलाकृती कुठवर पोहोचली आणि आपल्यावर किती जबाबदारी आहे याची मला जाणीव झाली".
क्षितीज पटवर्धन लिखीत आणि दिग्दर्शित ‘आज्जीबाई जोरात’ हे मराठी रंगभूमीवरील पहिले AI महाबालनाट्य आहे. यात अभिनय बेर्डे, निर्मिती सावंत, मुग्धा गोडबोले, पुष्क श्रोत्री आणि जयवंत वाडकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या ३० एप्रिल २०२४ रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे.