सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत आहेत.
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलेक्सी घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाबद्दल आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे हा गोळीबार दोन अज्ञान इसमांकडून करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींना दुसऱ्याच दिवशीगुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती. आता या (Salman Khan) घटनेसाठी वापरणाऱ्या बंदुकीचा पोलिसांनी शोध घेतला आहे.
या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीतून वापरलेली बंदूक जप्त केली आहे. यासोबतच त्यांना एक जिवंत काडतूसही सापडली असून या दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडे दोन बंदुका असल्याची कबूली दिली होती. आता पोलीस दुसऱ्या बंदुकीचा शोध घेत आहेत.
सागर पाल आणि विकी गुप्ता या आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर सुरतला जाताना ही बंदूक तापी नदीत फेकली असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला. त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या आणि त्यांना दोन्ही बंदुकांमधून १० राऊंड फायरिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते, असाही खुलासा आरोपींनी चौकशीदरम्यान केला होता.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची एक टीम बंदूक जप्त करण्यासाठी सुरतला पोहोचली होती. एन्काउंटर स्पेशालिस्ट सीनियर पोलीस इन्स्पेक्टर दया नायक हे देखील मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमसोबत सुरतला गेले होते. स्थानिक गोताखोर आणि मच्छिमारांच्या मदतीने एक बंदूक जप्त करण्यात आली अशी माहिती देण्यात आली.