लोकसभेच्या रणांगणात नव्या रणनितीकारांचे पर्व

02 Apr 2024 18:31:36
New Leadership in All Parties

नवी दिल्ली : (पार्थ कपोले)यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वच अर्थांनी परिवर्तनाची ठरत आहे. भाजप आणि काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांची रणनिती आखण्याची जबाबदारी नव्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे निवडणुकीतील यशापयश या नेत्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपमध्ये अटल – अडवाणी पर्वापासून कार्यरत अरुण जेटली आणि प्रखर वक्त्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. काँग्रेसमध्येही दीर्घकाळपर्यंत रणनितीचा प्रमुख चेहरा असलेले अहमद पटेल हयात नाहीत, ए. के. अँटनी दूर आहेत तर गुलामनबी आझाद यांनी स्वतंत्र पक्षच स्थापन केला आहे. सपाचे मुलायमसिंह यादव, रालोदचे अजित सिंह यांचेही निधन झाले आहे. मौसम वैज्ञानिक म्हणून ओळखले जाणारे रामविलास पासवानही हयात नाहीत. तर जदयुची रणनिती आता आरसीपी सिंह नव्हे तर के. सी. त्यागी बघतात. राजदचे लालू यादव सल्लागाराच्या भूमिकेत आहेत, तर तृणमूल काँग्रेसमध्येही ममतांची भिस्त पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आहे. ओडिशामध्ये बिजदचे उत्तराधिकारी म्हणून व्ही. के. पांडीयन यांचा राज्याभिषेक नवीनबाबूंनी केला आहे.

असा झाला आहे बदल

भाजप – भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नि:संशयपणे पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत. मात्र, पक्ष संघटनेची रणनिती आखण्यासाठी नव्या पिढीच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासोबत कार्यरत राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, सुनील बंसल यांच्याकडे प्रमुख जबाबदारी आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, भुपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर, हिमंत बिस्वसर्मा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आदी नेते सक्रीय आहेत. आणि अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे रणनितीवर बारकाईने लक्ष असतेच.

काँग्रेस – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या साथीला यंदा सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यमप्रमुख जयराम रमेश यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. त्यासोबतच ट्रबलशुटर डी. के. शिवकुमार, दीपेंद्र हुडा, गौरव गोगोई, भूपेश बघेल हेदेखील सक्रिय आहेत.

समाजवादी पक्ष – मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर पक्षाच्या रणनितीची जबाबदारी अखिलेश यांनी काका शिवपाल यादव आणि प्रा. रामगोपाल यादव आखत आहेत.

राष्ट्रीय जनता दल – तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यादव यांच्या छायेतून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. आपला पक्ष राजद त्यांनी कालबाह्य होऊ दिलेला नाही. त्यामुळेच केवळ बिहार नव्हे तर इंडी आघाडीमध्येही त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

लोकजनशक्ती पक्ष – रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोजपाचे दोन भाग होऊन मुलगा चिराग आणि बंधु पशुपती पारस हे आमनेसामने आले. भाजपने पारस यांना मंत्रीपद तर दिले, मात्र लोकसभेसाठी युती चिराग पासवानसोबत केली. अर्थात, त्यामुळे चिराग पासवान हेच रामविलास पासवान यांचे उत्तराधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या निवडणुकीत चिराग यांचाही कस लागणार आहे.
 
नवे भिडू सज्ज

प्रत्येक पक्षामध्ये एक किंवा दोन नेते हे प्रमुख चेहरा असतात, मात्र पक्षाची यंत्रणा कामाला लावण्यासाठी पडद्यामागून अनेक नेते कार्यरत असतात. सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुलायमसिंह यादव, अहमद पटेल, रामविलास पासवान आदी नेत्यांनी भारतातील लोकसभा निवडणुकांचे दीर्घकाळपर्यंत आपापल्या पक्षांसाठी नियोजन केले होते. मात्र, आता अनेक पक्षांमधील अनेक दिग्गज आता हयात नाहीत, तर काहींनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांमध्ये लोकसभेची रणनिती आखणारी नवी टीम तयार झाली आहे.



Powered By Sangraha 9.0