सोलापूर : पप्पू हे त्यांचं घरचं नाव आहे तुम्ही राहूल गांधी म्हणा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. महायूतीचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपूते यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे मंगळवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
"कमळाचं बटण दाबंलं तर मोदींना मत जातं आणि तुतारीचं दाबलं तर कोणाला मत जातं? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना विचारला होता. यावर जनतेतून पप्पू असा आवाज आला. यावर ते म्हणाले की, "पप्पू हे त्यांचं घरचं नाव आहे. तुम्ही राहूल गांधी म्हणा."
हे वाचलंत का? - शिवसेना कुणाची? ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही लोकांना वाटतं की, ही निवडणूक निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे, काहींना वाटतं की, राम सातपूते विरुद्ध शिंदे आहे. पण ही निवडणूक यांची नाही तर ती केवळ नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहूल गांधी अशी आहे. ही ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि विधानसभेची निवडणूक नाही, तर ही निवडणूक भारताचा नेता आणि देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे."
"याठिकाणी केवळ दोनच पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातील महायूती तर दुसरा पर्याय हा राहूल गांधी आणि त्यांच्या अंतर्गत २६ पक्ष आहेत. मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं पॉवरफूल इंजिन आहेत आणि यामध्ये एनडीएचे डबे लागलेले आहेत. आपल्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. दुसरीकडे, राहूल गांधींच्या गाडीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे सगळे स्वत:ला इंजिन म्हणतात. तिथे डबे नाहीत," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.