नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा रोडमॅप तयार करण्यासाठी भाजपचा जाहिरनामा महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या लोकसभा निवडणूक जाहिरनामा समितीची बैठक सोमवारी दिनदयाल उपाध्याय मार्गावरील मुख्यालयात पार पडली.
त्याची माहिती समितीचे सह – संयोजक केंद्रीय पियुष गोयल आणि सदस्य विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. ते म्हणाले, बैठकीस ८ केंद्रीय मंत्री, ३ मुख्यमंत्री आणि अन्य सदस्य बैठकीस उपस्थित होते. यावेळी विकसित भारताच्या रोडमॅपविषयी चर्चा करण्यात आली.
जाहिरनाम्यासाठी देशभरात ३५ दिवस ३ हजार ५०० हून अधिक विधानसभा क्षेत्रांमध्ये ९१६ चित्ररथ फिरविण्यात आले होते. त्याअंतर्गत देशभरातील १०० शहरांमध्ये समाजातील विविध नागरिक, व्यावसायिकांच्या संघटना, बुद्धीजीवी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मिस कॉलद्वारे जवळपास पावणेचार लाख तर नमो एपद्वारे जवळपास १ लाख ७० हजार सुचना प्राप्त झाल्या आहेत. या सुचनांवर सविस्तर चर्चा करून लवकरच जाहिरनामा प्रकाशित केला जाणार असल्याचेही गोयल यांनी नमूद केले आहे.
राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या इंडी आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएममध्ये फिक्सिंगचा आरोप करत मोदी सरकारला धारेवर धरले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात भाजपने आता निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.