नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी भारतरत्न प्रदान केला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि अडवाणी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भारतीय राजकारणाचे नायक लालकृष्णअडवाणी यांनी सात दशकांहून अधिक काळ अखंड समर्पण आणि देशाची सेवा केली आहे.
१९२७ मध्ये कराचीमध्ये जन्मलेले अडवाणी १९४७ मध्ये फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतात आले. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या त्यांच्या दृष्टीने त्यांनी देशभरात अनेक दशके कठोर परिश्रम केले आणि सामाजिक-राजकीय परिदृश्यात बदल घडवून आणले. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला तेव्हा त्यांच्यातील अदम्य योद्ध्याने लोकशाहीस हुकूमशाही प्रवृत्तीपासून वाचवण्यास मदत केली, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.
संसदपटू या नात्याने त्यांच्या संवादावरील विश्वासाने संसदीय परंपरा समृद्ध केल्या, असेही गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. त्यांनी पुढे म्हटले की, गृहमंत्री आणि उपपंतप्रधान या नात्याने त्यांनी नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, ज्यामुळे त्यांना पक्षातीत आदर प्राप्त झाला. भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्यांचा दीर्घ आणि अथक संघर्ष २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणीत परावर्तित झाला.
ते स्वातंत्र्यानंतरच्या मोजक्याच काही राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, जे राष्ट्रीय प्राधान्यक्रम बदलण्यात आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी ठरले. त्यांची कामगिरी भारताच्या जन्मजात प्रतिभा आणि सर्वसमावेशक परंपरांची उत्कृष्ट अभिव्यक्ती दर्शविते, असेही राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले आहे.