"कितीही झालं तरी उर्फी जावेद माधुरी दिक्षित होऊ शकत नाही!"
14 Mar 2024 12:19:31
मुंबई : कितीही झालं तरी उर्फी जावेद माधुरी दिक्षित होऊ शकत नाही, अशी टीका भाजप नेते अतूल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. नुकतेच मुंबई बहुचर्चित वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्धाटन पार पडले. परंतू, कोस्टल रोड हे उद्धव ठाकरेंचे श्रेय असल्याचा दावा उबाठा गटाकडून करण्यात येत आहे. यावरून आता भातखळकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
अतूल भातखळकर यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, "कर्तृत्त्व नसलेले लोक कायम दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कितीही आव आणला तरी उर्फी जावेद, माधुरी दीक्षित होऊ शकत नाही," असे ते म्हणाले.
याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंचा एक फोटोही शेअर केला आहे. कोस्टल रोडचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना धन्यवाद, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. सोमवार, ११ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्धाटन पार पडले.
मात्र, "कोस्टल रोड आणि एमटीएचएल हे दोन्ही काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. कोस्टल रोड हे पुर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका व्यक्तीचं स्वप्न आहे. ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे," असे वक्तव्य आदित्य ठाकरेंकडून करण्यात आले होते. यावरुन आता अतूल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.