राज्यात मिशन ४५+ शक्य होणार! टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणात नेमकं काय?

08 Feb 2024 13:35:16
  Modi - Shinde
 
मुंबई : देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये देशात लोकसभा निवडणूका होणार आहेत. निवडणूकांच्याआधी कोणाची सत्ता येईल. याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सुद्धा वेगवेगळे दावे करत आहेत. त्यातच आता टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेक्षणामध्ये २०२४ लोकसभा निवडणूकीत कोणाचे पारडे जड असेल याविषयी आपल्या सर्व्हेक्षणामध्ये अंदाज बांधला आहे.
 
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ च्या निवडणूकीत भाजपने २३ जागा मिळवल्या होत्या. तर, भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला होता. २०२४ मध्ये महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून महायुती स्थापन केलेली आहे. तर काँग्रेस, उबाठा गट आणि शरद पवार गट या तिघांची मिळून महाविकास आघाडी आहे.
 
टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेक्षणानुसार, राज्यात भाजपप्रणित महायुतीला ३९ जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज बांधला आहे. तर या सर्व्हेमध्ये महायुतीला अवघ्या ९ जागांवर विजय मिळेल, असे सांगण्यात आले आहे. सर्व्हेक्षणामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एनडीए महाराष्ट्रात आपले वर्चस्व कायम राखणार आहे. या सर्व्हेतील अंदाज खरे ठरल्यास, महाविकास आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.
 
२०२४ लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. या सर्व्हेनुसार या लक्ष्यासाठी महायुतीला आणखी काम करावे लागणार आहे. पण दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0