छत्रपती संभाजीनगर : आपल्याला धनुष्यबाणाने वेध घेऊन अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे. बुधवारी धाराशिव जिल्ह्यात पार पडलेल्या शिवसंकल्प अभियानात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपण दोन वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाच्या शत्रुंचा धनुष्यबाणाने अचूक वेध घेतला आहे. आता आपल्या हातात प्रभू रामचंद्राचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण आहे. या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची आहे. यासाठी हा शिवसंकल्प आपण हाती घेतला आहे."
"महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाहीत. आजही शिवसेना चोरली, ती आमचीच आहे अशी दररोज गावभर बोंबाबोंब करत आहेत. पण तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील? ही समोर बसलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे. माझं कुटुंब एवढं छोटं नाही, तर अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे," असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "तुम्ही तर वर्षा बंगल्याची माडी अडीच वर्ष खाली उतरला नाहीत, तर दाढी कशी खेचणार? तुमच्या अहंकाराची गाडी दोन वर्षांपुर्वी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे. म्हणून विसरु नका की, या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. त्यामुळे मला बोलायला लावू नका, मला हलक्यात घेऊ नका," असेही ते म्हणाले आहेत.