पवारांच्या हातून पक्ष निसटला! बावनकुळे म्हणतात, "अजितदादा राष्ट्रवादीला..."

06 Feb 2024 21:15:27
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar

मुंबई : निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे निर्णय दिल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मी अजित दादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय दिला. जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे व संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा कौल आहे. त्यांच्याकडे तो निकाल साधारणतः दिसतो. अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पुढे घेऊन जातील. विरोधकांचे काम विरोधात बोललेच आहे म्हणून त्यांचे नावच विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील, असा टोला लगावत निवडणूक आयोगावर टीका टिपणी करणे योग्य नाही, असे सांगितले. निवडणूक आयोग कधीच बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतो. त्यामुळे आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारले पाहिजे असेही ते म्हणाले.

दरम्यान प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला २००८ आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालिन कॅांग्रेस सरकारकडे मागितले गेले. हे पुरावे मागितल्यावर कॅांग्रेसच्या वकीलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर जन्मभूमीचे पुरावे दिले आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर साकारायला परवानगी मिळाली. मोदी सरकार आल्यानेच मंदिर साकारले, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

अयोध्येत श्रीराम दर्शनासाठीची १४०० रामभक्तांची महाराष्ट्रातील दुसरी आस्था रेल मंगळवारी पुण्यातून मार्गस्थ झाली, त्यानंतर बावनकुळे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या भाजपा पदाधिकारी आणि रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोदी सरकार आले म्हणूनच राम मंदिर साकारले, असे सांगून बावनकुळे पुढे म्हणाले, ‘ श्रीराम मंदिर साकारल्याबद्दल जगभरातील हिंदू मोदीजींचे आभार मानत असून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत, यातच त्यांचा नास्तिकपणा उघड झाला. त्यामुळे ठाकरेंचे बेगडी प्रेम आणि हिंदुत्व जनतेच्या लक्षात आले.केवळ मतांच्या राजकारणासाठी उद्धव अयोध्येला गेले नाहीत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव किती खाली गेलेत हे कळले. शिवाय सावरकरांचा अपमान केला गेला, हिंदु सनातन धर्म संपवून टाकू, असे सांगणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनसोबत उद्धव यांनी युती केली कॅांग्रेसचे दर्शनाला कोणी गेले नाही, तर उद्धव ठाकरेंनी न जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.



Powered By Sangraha 9.0