जळगाव : एकनाथ खडसे वारंवार लोकांच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण ते स्वत: तर भ्रष्टाचाराचे कुलगुरुच आहेत, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गौण खनिज घोटाळ्याप्रकरणी १३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, गिरीश महाजनांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, "तुमच्याकडे एक रुपया जरी बाकी असली तर तुम्हाला निवडणुक लढवता येत नाही. एकनाथ खडसे महसुल मंत्री होते तर त्यांनी काही विचार केला असेल. एकनाथ खडसेंची चोरी ही चोरी नसून तो डाका आहे. १३७ कोटी रुपयांचा त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्यांना तो भरावाच लागेल."
"आपण लोकांच्या भ्रष्टाचारावर वारंवार बोलतो पण स्वत: तर भ्रष्टाचाराचे कुलगुरुच आहात. त्यामुळे एवढ्या लोकांना छळताना त्यांच्यावर आरोप करताना त्यांच्याकडे एक बोट दाखवत असाल तर चार बोटं आपल्याकडे आहेत. याचा विचार आता केला पाहिजे," असा टोलाही महाजनांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेतली आणि त्यातून मुरूम उत्खनन करुन तो हायवेला दिला. मात्र, हे करताना त्यांनी रॉयल्टी भरली नाही. खडसेंसारखे मंत्री राहिलेले नेते हे ८४ एकरचा डोंगर खोदून काढताता आणि एक रुपयाचीही रॉयल्टी भरत नाही. त्यांना वाटतं की, मांजर डोळे मिटून दुध पित आहे तर त्यांना कोणी बघत नाही."
"या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाल्यानंतर १३७ कोटी रुपये दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर ते कोर्टात गेले पण कोर्टाने त्यांना धुडकावून लावले आणि सांगितलं की, प्रांताकडे जाऊन दाद मागा. त्यांना आधी ३५ कोटी रुपये भरावे लागणार आहे. पण ते भरु शकले नाही. म्हणून शासनाने त्यांच्या सगळ्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. येत्या काळातही त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाण्याचीही शक्यता आहे," असेही ते म्हणाले.