नवी दिल्ली : किमान हमीभावासह अन्य मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी आंदोलनास प्रारंभ केला आहे. देशाची राजधानी दिल्लीच्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात काही शेतकरी संघटनांनी जमण्यास प्रारंभ केला आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) च्या कायदेशीर हमीसह त्यांच्या मागण्यांवर दोन केंद्रीय नेत्यांसोबत अयशस्वी झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही सीमेवर दंगलविरोधी गणवेशातील पोलीस आणि निमलष्करी दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.
तसेच, दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू केले आहे, ज्यामध्ये पाच किंवा त्याहून अधिक लोक एकत्र येणे, मिरवणूक किंवा रॅली आणि लोक घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. .
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मंगळवारी (१३ फेब्रुवारी २०२४) न्यायालयाने सांगितले की, हे लोक भारतीय नागरिक आहेत. त्यांनाही देशात मुक्तपणे वावरण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारांनी अशी क्षेत्रे ओळखली पाहिजे जेथे हे लोक आंदोलन करू शकतात. याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या होणार आहे.