मुंबई : राजकीय, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही विषयांवर आपली मते परखडपणे मांडणारी अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात लागू केलेल्या आणीबाणीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका एका मुलाखतीत तिने राजकीय प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे. तसेच, इमर्जन्सीचा काळ हा भारतातील इतिहासातील काळा अध्याय होता असेही वक्तव्य तिने केले.
कंगनाला या मुलाखतीत तुला देशाची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत कंगना म्हणाली, “मी ‘इमर्जेन्सी’ हा चित्रपट केला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर मी पंतप्रधान व्हावे असे कोणालाच वाटणार नाही. ‘इमर्जेन्सी’ हा आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि काळा अध्याय आहे. ज्याबद्दल आपल्या भारतातील तरुणांना माहीती असावं असं मला वाटतं.”
तसेच, या पुर्वी कंगनाने तिच्या राजकारणातील प्रवेशावरही भाष्य केले होते. ती म्हणाली होती “जर भगवान कृष्णाची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणुकाही लढवेन.”आता नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा राजकीय प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले होते. 'इमर्जन्सी' या चित्रपटात कंगना केवळ अभिनयच करत नाही आहे तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. १४ जून रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.