मुंबई : कांग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे, मुंबईतील भाजप कार्यालयात एका पक्षप्रवेशाची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अशोक चव्हाणांनी आधी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेत त्यांना विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा या दोन नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.