"देवेंद्र फडणवीस म्हणजे १५-२० कंप्युटरची क्षमता असलेले नेतृत्व"

11 Feb 2024 15:45:12

Fadanvis


नाशिक :
देवेंद्र फडणवीस म्हणजे १५-२० कंप्युटरची क्षमता असलेले नेतृत्व आहे, असे कौतुकोद्गार मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले आहेत. नाशिकमध्ये जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलरथ उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
गुलाबराव पाटील म्हणाले की, "सरकार पडलं होतं. मागच्या काळात आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा आम्हालाही खेचून आणलं. फडणवीसांनी अशी काही जादू केली की, घड्याळसुद्धा बदलून टाकलं. राजकारणात एवढं यश मिळवणारा माणूस पाण्याच्या प्रश्नातही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. माझ्या राजकारणाच्या अनुभवात मी बरेच नेते बघितले. परंतू, तुम्ही कुठल्याही विषयावर विना कागदाचा बोलणारा हा एकमेव नेता आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "कंप्युटर एकच असतं पण देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात १५-२० कंप्युटर आहे की, काय याचा मी कायम विचार करत असतो. कोणत्याही विषयावर, कुठल्याही ठिकाणी कसं उत्तर द्यावं आणि सभागृह कसं गोल फिरवावं, हे त्यांना चांगल्या प्रकारे जमतं," असेही ते म्हणाले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे हेसुद्धा उपस्थित होते.





Powered By Sangraha 9.0