हा काही पोरखेळ आहे का? अजितदादांनी टोचले ठाकरेंचे कान

11 Feb 2024 17:34:58

Ajit Pawar & Uddhav Thackeray


मुंबई :
थोडं काही घडलं की, सरकार बरखास्त करा म्हणतात. हा काही पोरखेळ आहे का? त्याला काही नियम कायदे, कानून आहेत की, नाही? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "याला काय अर्थ आहे? २१० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना थोडं तरी कळतं का? मागच्या काळात अशा घटना घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं समर्थन करत नाही पण थोडं काही घडलं की, सरकार बरखास्त करा म्हणतात. हा काही पोरखेळ आहे का? त्याला काही नियम कायदे, कानून आहेत की, नाही? उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरकार बरखास्त करा म्हणायचं. हा कसला पोरकटपणा आहे?" असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "बाबा सिद्दीकी यांनी माझ्यासोबत तीन टर्म आमदार म्हणून वांद्रा येथील प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांनी चार वर्ष राज्य मंत्रिमंडळ आणि दोन टर्म महानगरपालिकेत काम केलं आहे. बाबा सिद्दीकी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत. आम्हाला निश्चितपणे त्यांचा फायदा मुंबईसह महाराष्ट्रातही होईल," असेही ते म्हणाले.





Powered By Sangraha 9.0