आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात, म्हणाले, "दु;खाच्या प्रसंगातही सत्तेसाठी..."

10 Feb 2024 18:30:26

Shelar & Thackeray


मुंबई :
एका कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे किंबहुना सगळ्यांसाठीच हा प्रसंग दु:खाचा आहे. अशावेळी उध्दव ठाकरे सत्तेसाठी धडपड करीत आहेत, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. यावरून उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी श्रीमान उध्दव ठाकरे यांनी केली आहे. कशासाठी? सत्तेसाठी? तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना कशासाठी शिव्याशाप देताय?" असा सवाल त्यांनी केला.
 

ते पुढे म्हणाले की, "ज्या कुटुंबाचे तुम्ही स्वतःला प्रमुख म्हणवून घेता, त्या कुटुंबातील घोसाळकरांचे दु:ख काळीज कुरतडून टाकणारे आहे. घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय? करतात काय? तर शब्दांच्या कोट्या? टोमणे? एका कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे किंबहुना सगळ्यांसाठीच हा प्रसंग दु:खाचा आहे अशावेळी श्रीमान उध्दव ठाकरे सत्तेसाठी धडपड करीत आहेत. मग आता मला सांगा. खरे लोमडी कोण?" असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0