मुंबई : ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलन करणे हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसं समजू शकता? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
केशव उपाध्ये म्हणाले की, "मारकडवाडी सध्या बरेच चर्चेत आहे. शरद पवार गटाच्या पुढाकाराने बॅलेटपेपर वर मतदान घेण्याचे थोतांड करण्यात आले. याचे कौतुक नेहमीच भाजपा-मोदी-फडणवीस द्वेषाच्या तमाशात तुणतुणे वाजवणारे संजय राऊत व अर्बन नक्शल्यांनी केले आहे. आता शरद पवार आणि राहुल गांधी येथे भेट देऊन परत मागणी करणार असल्याचे शरद पवार गटाचे सांगणे आहे. परंतू, असा कोणताही प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात असून घटनेचा हा अपमान आहे."
हे वाचलंत का? - सामनातूनच उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचं काम सुरु! नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
"बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक संस्थेला काही जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. निवडणूका घेणे हे निवडणूक आयोगाचेच काम आहे. उद्या मला निकाल मान्य नाही म्हणून कुणी न्यायालय वेगळे सुरू करेल कोणी अजून वेगळे प्रकार करेल. ईव्हीम निकाल तेव्हाच अमान्य होतो जेव्हा भाजप जिंकते. उदा. लातूर शहरात अमित देशमुख जिंकले, तर ईव्हीएमची तक्रार नाही. मात्र, लातुर ग्रामीणमध्ये त्यांचं बंधू हरले आणि भाजप जिंकले तर मात्र ईव्हीम मध्ये घोळ असतो. असला भंपकपणा जनता ओळखून आहे म्हणूनच विरोधकांना ती महत्व देत नाही," असे ते म्हणाले.
दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत!
ते पुढे म्हणाले की, "परवा मारकडवाडी येथे झालेल्या बॅलेट पेपरवर निवडणुक होणार या नाटकाची कल्पनाही तिथल्या ग्रामस्थांना नव्हती. मुलाखतीत तसे सगळ्यांनी स्पष्ट सांगितले. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते ग्रामस्थांना पुढे करून स्वतःच कुठेतरी शिक्के मारत बसणार आणि EVM कसे खोटे आहे, हे सिद्ध करणार. जनतेला तुम्ही एवढे अडाणी कसे समजू शकता? याच जनतेने विचार करून, ठरवून महायुतीला निवडून दिले आहे. अनेक वेळा संधी देऊनही विरोधकांना ईव्हीएम विरोधात एक साधा पुरावासुध्दा देता आला नाही, कारण मुळात दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत आहे," अशी टीकाही केशव उपाध्येंनी केली आहे.