आयरे गावातील जनजातींची संकल्प पूर्ती

27 Dec 2024 11:57:37

Aayare Village Hanuman Mandir Pranpratishtha

मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Aayare Village Hanuman Mandir) 
पालघर जिल्ह्यातील केशव सांस्कृतिक मंडळच्या सहकाऱ्याने आयरे गावातील (ता. जव्हार) श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी संपन्न झाला. बंगळूरचे बालयोगी महंत श्रीगणेशदासजी (उदासीन) यांच्या शुभहस्ते हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात करण्यात आली.

कर्मयोगी कै. सोनूबाबा यांनी आयरे गावात आधी हे मंदिर बांधले होते. कालांतरने ते जीर्ण होत गेले. 'अयोध्येत राम मंदिर होऊ शकते मग आपल्या गावात हनुमंताचे मंदिर का होऊ शकत नाही', असा प्रश्न जेव्हा गावकऱ्यांना पडला तेव्हा त्यांनी याच मंदिराचा जीर्णोद्धार करायचा संकल्प केला.

हे वाचलंत का? : मंदिरे सरकार नियंत्रणातून मुक्त करा; आगामी दिवसात 'विश्व हिंदू परिषद'चे विशेष अभियान

यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराड उपस्थित होते. प्रत्येक जनजाती (आदिवासी) हा हिंदूच आहे याबाबत त्यांनी उतस्थितांना मार्गदर्शन केले. "जनजातींची ओळख केवळ निसर्ग पूजक नसून ते हिंदूही आहेत. कारण सनातन हिंदू धर्मही तितकाच निसर्ग पूजक आहे. वास्तविक जनजातींच्याच मदतीने श्रीरामांनी लंकेवर स्वारी करून रावणाचा वध केला. जर जनजातींचा तेव्हा पासून रामायणाशी, हनुमंताशी संबंध असेल तर मग ते हिंदू का नाहीत. जनजाती समाजाला तोडायचं काम काही अधर्मीय करत आहेत. यातूनच पुढे साधू हत्याकांड सारख्या गोष्टी घडतात.", असे ते म्हणाले.


Aayare Village Hanuman Mandir

या सोहळ्या दरम्यान संपूर्ण आयरे गाव भगवे झेंडे, पताक्यांनी सजले होते. गावातील एकूण पाच दाम्पत्यांना प्राणप्रतिष्ठा पूजेचा मान मिळाला होता. गावातील लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती या वेळेस होती. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाचा शेवट झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रा. प्रमोद थालकर सर यांनी केले.

प्रत्येक गावात एक मंदिर असावे
आयरे सारख्या डोंगराळ भागातील गावकऱ्यांनी केलेला संकल्प पूर्ण करून दाखवला. प्रत्येक गावात एक मंदिर असावे. त्यामुळे गावाला एक संस्कार, ध्येय, शक्ती मिळते. परमेश्वराचे नामस्मरण केल्याशिवाय काही साध्य होत नाही. आपण याच हनुमंताचे भक्त आहोत आणि याची सेवा करणे आपले कर्तव्य आहे.
- हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड मतदारसंघ, भाजप

गावकऱ्यांनी केलेल्या संकल्पाची ही फलश्रुती
आयरे गावातील गावकाऱ्यांनी पै-पै जमवून हे मंदिर उभे करून दाखवले आहे. ५-६ महिन्यात मंदिर उभं राहिलं. मंदिराच्या माध्यमातून गावचा विकास नक्की होईल असा विश्वास आहे. गावकऱ्यांनी केलेल्या संकल्पाची ही फलश्रुती आहे. वडिलोपार्जित स्वप्न साकार झाले.
- वीरेंद्र चंपानेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रगती प्रतिष्ठान

Powered By Sangraha 9.0