गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

25 Dec 2024 14:34:43
 
Fadanvis
 
नागपूर : गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवण्याची माझी ईच्छा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पालकमंत्र्यांसदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांशी बसून कुठे कोण पालकमंत्री असतील याचा निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितल्यास मी तिथेसुद्धा जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलेही पालकत्व ठेवत नसतात. पण गडचिरोली माझ्याकडे ठेवण्याची, माझी स्वत:ची ईच्छा आहे. या तिन्ही नेत्यांनी मान्यता दिल्यास मी गडचिरोली माझ्याकडे ठेवणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाला धक्का! अद्वय हिरे यांचे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यत्व रद्द
 
ते पुढे म्हणाले की, "गडचिरोली ही पुढची स्टील सिटी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद कमी होताना दिसतो आहे. ज्या भागात आपण कधीच जात नव्हतो त्या भागात जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात एकप्रकारे निकराची लढाई होताना दिसत आहे. त्यातून निश्चितपणे गडचिरोलीसारखे क्षेत्र बदलण्याचे काम करणार आहोत. ज्याप्रमाणे विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या संधी येत आहेत त्यामुळे विदर्भातसुद्धा औद्योगिक इकोसिस्टिम उभी राहतीये. आम्ही सुरु केलेल्या योजना आम्हाला पुढे चालवायच्या आहेत. या योजनांचा भार आमच्या अर्थसंकल्पावर पडेल हे खरे असले तरी आम्ही त्याचेसुद्धा योग्य नियोजन करतो आहोत. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरु केला आहे," असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
 
अडचणींवर मात करून जनतेच्या मनातील कामे करू!
 
"लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात तयार करण्यात आलेला फेक नरेटिव्ह विधानसभेत आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय महायुतीला मिळाल्या आहेत. यासोबतच भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातील उच्चांक असलेल्या १३२ जागा मिळवता आल्या. एवढा चांगला जनादेश मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. कुठलाही जनादेश जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतो. यात आव्हाने, अपेक्षा असतात. शिवाय काम करत असताना काही अडचणी आणि मर्यादासुद्धा असतात. या सगळ्यावर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजे हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे."
 
 
 
Powered By Sangraha 9.0