नागपूर : "जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू", अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी केली. जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल, असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. 'जनता सर्वोपरी...' असे आपले कामजाजाचे धोरण राहणार असून देशातील सर्वांत चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यात सुमारे ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित असून, यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्याने विदर्भात अधिक असून,यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. याखटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे बावनकुळे म्हणाले.
जनतेचे हेलपाटे कमी करू
शेतकरी-शेतमजूरांशी संबंधित असणाऱ्या या खात्यात अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून राज्याच्या विकासाची गती वाढविण्यात येईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले , की कागदपत्रांशी निगडित नागरिकांची महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे असतात. नागरिकांना या कामांसाठी तलाठी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते शासनस्तरापर्यंत कमीत कमी हेलपाटे मारून काम कसे करता येईल, यासंबंधी लवकरच उपाययोजना आखू आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देवू.
मुद्रांक शुल्क, जमाबंदी आयुक्त तसेच वाळूशी संबंधित धोरणांमध्ये सुलभीकरण करण्याचा तसेच वाळूमाफियांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, धोरण प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी इतर राज्यांतील उपयुक्त कायद्यांचाही अभ्यास करणार असून येत्या काळात महसूल विभागात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सरकारमध्ये योग्य समन्वय
बहु पक्षीय सरकार समजुतीने चालवावे लागते. त्यासाठी समन्वय आवश्यक असतो. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपामध्येही तो दिसून आला आहे. तसेच, पालकमंत्रिपदांचे वाटप करतानाही कोणतीही कुरबूर न होता आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून पालकमंत्रिपदांचे वाटप करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. छगन भुजबळ हे महायुतीतील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, असेही बावनकुळे यांनी भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राहुल गांधी यांचा दौरा म्हणजे नौटंकी
राहुल गांधी यांचा परभणी येथील दौरा हा नौटंकी आहे. परभणी येथे घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी असून, घटनेतील आरोपी मनोरुग्ण आहे. आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरीसुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीचा दौरा करत आहेत. परंतु, मागासवर्गीय, ओबीसी असे सर्व समाज राज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून, कोणताही समाज त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. डॉ. आंबेडकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात येऊ शकणार नाहीत, यासाठी राजकारण केले. त्यामुळे जनतेलाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची नौटंकी कळत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.