साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या!

21 Dec 2024 18:27:17
 
amit gorkhe
 
नागपूर : (MLA Amit Gorkhe) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न द्या, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी विधान परिषदेत केली.
 
नियम २६० अन्वये चर्चेत त्यांनी भाग घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ महायुती सरकारने केलेली कामे, तसेच काँग्रेसचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरविरोधाचा इतिहास यावर गोरखे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न, त्यांचे लंडनमधील घर, आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी, भारतामध्ये संविधान दिन साजरा करणे, अशी जबाबदारीची कामे आमच्या केंद्र शासनाने आणि महायुती सरकारने केली, याचा मला अभिमान आहे. हिंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम जवळपास ४७ टक्के पूर्ण झाले असून २०२५ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
 
त्याव्यतिरिक्त सुमारे १ हजार आसनक्षमतेचे प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरिता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपाहार गृह, प्रशासकीय कार्यालये, स्वच्छतागृह, बगीचे, वाहनतळ असे मोठे काम त्या ठिकाणी होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे दीक्षाभूमीला आणखी ५७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार गोरखे यांनी केली.
 
 
काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वेळोवेळी सन्मान करण्याचे काम भाजपने वेळोवेळी केले. याऊलट काँग्रेसने आजतागायत बाबासाहेबांचा अपमानच केला. 'शॅडो प्राईम मिनिस्ट्री'ची स्थापना करून सोनिया गांधींनी घटनेचे उल्लंघन केले. भंडारा पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पाडण्याचे कामही याच काँग्रेस सरकारने केले होते. बाबासाहेबांनी मांडलेल्या 'हिंदू कोड बिला'ला विरोध करण्याचे काम देखील काँग्रेस सरकारने केले आणि त्याचमुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणीबाणीसारखी अनेक संविधानविरोधी कामे वेळोवेळी काँग्रेसने केली, असा हल्लाबोल आ. अमित गोरखे यांनी केला.
 
वाटोगावात भव्य स्मारक उभारा
 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ गाव असणाऱ्या वाटेगावात आण्णाभाऊंचे भव्य स्मारक होण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा. अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून, राज्य शासनाने या गोष्टीचा विचार करावा. सोबतच मातंग समाजासह संपूर्ण साहित्यिकांची असलेली मागणी म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0