अकोल्यात भारत जोडोच्या कार्यक्रमात वंचितचा राडा? काय घडलं?

21 Oct 2024 18:20:14

yogendra yadav
मुंबई : ( Vanchit Bahujan Aghadi ) स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तसेच भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील विचारसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी गोंधळ घातला. कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की, घोषणाबाजी करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे त्या भागात काही काळ चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते.
 
नेमकं काय घडलं ?
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानांतर्गत योगेंद्र यादव यांच्या विचारसभेचे आयोजन शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत' या विषयावर विचारसभा सुरू होती. या विचारसभेमध्ये योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असतांना सभागृहात उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
 
आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या व आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला मतदान कसे करावे? असा प्रश्न योगेंद्र यादव यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला. तसेच महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यावर काँग्रेसने कुठलीही कारवाई केली नाही. भाजपविरोधी मत व्यक्त करतांना मतदारांनी मतदान कुणाला करावे, यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावरूनही विचारसभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की केली. विचारसभेच्या आयोजकांनी सुरक्षेचा घेराव करून योगेंद्र यादव यांना सभागृहातून बाहेर काढले.
 
यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसला समर्थन करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिस बंदोबस्तामध्ये योगेंद्र यादव यांना अकोल्यातून पुढे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
योगेंद्र यादव यांनी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी अकोल्यात विचारसभा घेतली. काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका आहे. त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने आरक्षण विरोधात वक्तव्य केले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले. या परिस्थितीत मतदारांनी काँग्रेसला मतदान कसे करावे? हे योगेंद्र यादव यांनी स्पष्ट करायला हवे होते. भाजपला विरोध असतांना पर्याय काय? यासंदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली. मात्र, ते एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत.
 
-डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
Powered By Sangraha 9.0