नवी दिल्ली : ( Dharmendra Pradhan ) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन वर्गीकृत अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री, युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.
सुंदर भारतीय भाषांचा अभिजात भाषांच्या यादीत समावेश केल्याबद्दल विद्वानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला. त्यांनी या भाषांच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी आपला पाठिंबा देण्याचा निश्चय केला. यावेळी, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “नव्या शिक्षण धोरणाप्रमाणे भारतीय भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशातील भाषिक वारसा साजरे करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशातील सर्व भाषा भारतीय आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगत असतात. मोदी सरकार सर्व भारतीय भाषांना बळकट करण्यासाठी आणि त्यामध्ये शिकण्याची सुविधा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. मातृभाषेतील अभ्यास सुलभ करण्यासाठी, सर्व भाषांवर समान लक्ष देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय उपस्थिती मजबूत करण्यासह बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी भाषा समिती काम करणार : नरेंद्र पाठक
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस महाराष्ट्रातील अभ्यासक - साहित्यिक उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्राध्यापक व साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संगीता बर्वे आणि नरेंद्र उपस्थित होते. यावेळी (पान 3 वर)मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा दिल्यानंतर भारतीय भाषा समितीचे काम वाढले आहे. अभिजात दर्जा मिळणे हा एक टप्पा असून त्यापुढेही भाषा समृद्धीसाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.