अर्थशास्त्रातील नोबेल आणि मथितार्थ

    15-Oct-2024
Total Views |
nobel prize winners economics


 यावर्षी अर्थविषयक नोबेल पारितोषिक अमेरिकेतील डेरेल असिमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रोबिन्सन यांना जाहीर झालेे. त्यांचे संशोधन राजकीय आणि सामाजिक संस्थांचा आर्थिक विकासातील सहभाग याबाबत असून, त्यामुळे वसाहतवादकालीन आर्थिक विकासाचा अभ्यास सोप्पा होणार आहे. या नोबेल विजेत्यांच्या संशोधनचा घेतलेला हा आढावा...

अर्थशास्त्रातील ‘नोबेल स्मृती पुरस्कार’ मिळवण्याची अमेरिकन नागरिकांची मक्तेदारी यावर्षी देखील कायम राहिली असून, 2024 सालचा ‘नोबेल स्मृती गौरव पुरस्कार’ हा डेरेल असिमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रोबिन्सन या तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना नुकताच जाहीर झाला. यापैकी डेरेल असिमोग्लू आणि सायमन जॉन्सन हे, अमेरिकेतील ‘एमआयटी’ या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, जेम्स रोबिन्सन हे शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत.

आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत राजकीय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग व भूमिका या क्षेत्रात मूलभूत संशोधन करून, त्याचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास जगासमोर मांडण्याचे काम या अर्थतज्ज्ञांनी केल्याचे ‘नोबेल स्मृती पुरस्कार’ निवड समितीने नमूद केले आहे. “विविध देशातील आर्थिक प्रगतीमधील वैधर्म्य आणि त्याची कारणे तपासून, त्याबद्दलची आपली समज वाढवण्याचे काम या तीन अर्थतज्ज्ञांनी केले,” असे निरीक्षण या समितीने मांडले आहे. कुठल्याही देशाचा आर्थिक विकास होत असताना, विविध प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या देशांमध्ये कायद्याची बाजू कमकुवत असते, आणि सामाजिक संस्था या समाजाचे शोषण करतात, त्या देशांची प्रगती खुंटते असे निरीक्षण या अर्थतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. या तीनही अर्थतज्ज्ञांच्या संयुक्त अभ्यासातून, अर्थशास्त्राच्या अध्ययनाची आणि संशोधनाची ऐतिहासिक पद्धत आणि संस्थात्मक अर्थशास्त्राच्या तत्त्वांना बरोबर घेऊन, या दोन्हींची सांगड घालण्याचे एक नवे तंत्र विकसित होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ‘नोबेल स्मृती पुरस्कार’ मिळवणार्‍या अमेरिकन अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डीन यांनी देखील , संशोधनाची ऐतिहासिक पद्धत वापरून श्रम बाजारामध्ये स्त्रियांचा सहभाग या विषयावर संशोधन केले होते.

यावर्षीच्या ‘नोबेल स्मृती पुरस्कारा’चे वैशिष्ट्य म्हणजे ज्या अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार विभागून दिला आहे, त्यांनी त्यांचे संशोधन वसाहतवादाच्या कालखंडापर्यंत मागे नेले आहे. वसाहतवादी काळ ते औद्योगिक क्रांतीचा कालखंड लक्षात घेता, वसाहतवादी युरोपीय देशांनी त्यांच्या वसाहती जगाच्या अनेक भागात स्थापन केल्यानंतर, त्या भागात अस्तित्वात असणार्‍या सामाजिक संस्था आणि समाज रचना विकासाच्या दृष्टीने कशा बदलत गेल्या, याचा चिकित्सक अभ्यास या अर्थतज्ज्ञांनी त्यांच्या संशोधनात केला आहे. वसाहतवादाच्या काळातील समाज रचनेतील बदल हा नाट्यपूर्ण असला, तरी देखील तो सगळीकडे सारखाच घडून आलेला नाही. जगाच्या अनेक भागात सामाजिक संस्थांमधील बदल हा वसाहतवादाच्या अनुषंगाने संसाधनांचे आणि स्थानिक लोकांचे शोषण करणारा ठरला, तर काही ठिकाणी वसाहतवादातून सर्व समावेशक अशा राजकीय आणि आर्थिक प्रणाली, संस्था निर्माण झाल्या. ज्यातून स्थानिक समाजाचे तसेच, युरोपीय निर्वासितांचे दीर्घकालीन हित साधले गेले. तसेच यातूनच आर्थिक प्रगतीचा मार्गही मोकळा झाला. याच कारणामुळे आर्थिक प्रगतीमध्ये असणारा फरक आणि जगामध्ये असणारी विषमतेची, आर्थिक विकासाची दरी आजही अस्तित्वात आहे. म्हणजे आजची वसाहतोत्तर विपन्नता ही वसाहत काळातील आर्थिक शोषणाचा परिपाक आहे, ज्यात नागरिकरणासारख्या घटकांनी कळीची भूमिका बजावली आहे, हे स्पष्ट होते.

मुळात आर्थिक विकासाच्या दृष्टीने राजकीय आणि सामाजिक संस्थांचा अभ्यास, हा विषय अर्थशास्त्रात नवीन नाही. 1919 साली वॉल्टन हेमिल्टन यांनी ‘अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू’ या नियतकालिकात ,या विषयाच्या संदर्भात एक शोधनिबंध लिहिला होता. त्यातूनच संस्थात्मक अर्थशास्त्राचा पाया रचला गेला. थोरस्टीन वेबलेन, जॉन कॉमन्स, रॉबर्ट फ्रँक, जॉन केनेथ गालब्रेथ आणि अगदी गुन्नर मिर्दाल यांच्यासारख्या नावाजलेल्या अर्थतज्ज्ञांनी, संस्थात्मक अर्थशास्त्राच्या पायाभरणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या कुठल्याही देशामध्ये अस्तित्वात असणार्‍या सामाजिक आणि राजकीय संस्था, या उत्स्फूर्तपणे अस्तित्वात येत असतात आणि समाजरचनेचा त्या एक भाग होऊन जातात. परंतु, वसाहतकालीन समाजरचनेत निर्माण झालेल्या संस्था आणि त्याचे परिणाम वसाहतींच्या जीवनावर खोलवर झाले आणि त्यातून वसाहतपूर्व काळात आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारी राष्ट्रे हळूहळू दुर्बल बनत गेली. अशा शोषक सामाजिक संस्थांमुळेच आर्थिक विकासाचा स्तर खालावत गेला. या पार्श्वभूमीवर राजकीय संस्थांचे या परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण असले, तरी त्यातून आर्थिक विकासाची शाश्वती प्राप्त होत नाही. त्यामुळेच दीर्घकालीन शाश्वत आर्थिक विकासही अशक्यप्राय होत जातो. किंबहुना, राजकीय संस्थांच्या या अपयशाच्या पार्श्वभूमीवर समाजाची मानसिकता हळूहळू लोकशाहीकडे झुकत जाते आणि त्यातून सामाजिक बदलाच्या शक्यता निर्माण होतात. तर दुसरीकडे जिथे राजकीय क्रांती होण्याची संभावना असते, तिथे राजकीय सत्तेला एका द्विधेला सामोरे जावे लागते. एकतर सत्तेत कायम राहणे किंवा आर्थिक सुधारणांची हमी देऊन, लोकानुनय साध्य करत क्रांतीच्या शक्यता कमी करणे, असे पर्याय राज्यसंस्थेसमोर उभे राहतात. परंतु, अशा राजकीय हमीवर लोक कितपत विश्वास ठेवतील? याची शाश्वती नसल्याने, सत्ता बदल आणि लोकशाहीचा उदय हे दोन्ही घटक अपरिहार्य ठरतात. तेथूनच आर्थिक प्रगतीच्या नव्या वाटा सुरू होतात.

असे असले, तरी देखील वसाहत पूर्व आर्थिक संपन्नता आणि वसाहतोत्तर आर्थिक विकासाच्या पद्धती किंवा धोरणे, यामध्ये लक्षणीय फरक पडत जातो. अशा द्वंद्वातून उभी राहिलेली समाजरचना एकतर अत्यंत विधायक अशा स्वरूपाची होते किंवा त्यातून विध्वंसक अशा समाज घटकांची निर्मिती होते. अर्थातच याचा परिणाम आर्थिक विकासावर होताना दिसून येतो. या अभ्यासातून वसाहतकालीन इतिहास ,त्याचा राजकीय,सामाजिक संस्थांशी असलेला परस्पर संबंध,तसेच त्याचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम यांची यथायोग्य सांगड घातली गेल्याचे दिसते. राजकीय आणि सामाजिक संस्थांचा उदय, त्यांची रचना आणि त्याचा आर्थिक विकासावर होणारा अभ्यास या विषयावर बेतलेला हा अभ्यास प्रकल्प म्हणजे, जणू जागतिक अर्थव्यवस्थेचा वसाहतकालपूर्व आणि वसाहतोत्तर कालखंड यांचा वेगवान चित्रपट असल्याचे भासते. विशेषतः भारतासारख्या वसाहतवादाच्या बळी ठरलेल्या आणि दीर्घकाळ विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाचा, आर्थिक इतिहास आपण वाचतो आहोत, अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

महत्त्वाचे म्हणजे या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा, प्राचीन युरोपात नांदलेली वसाहतवादी मानसिकता आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासावर झालेले चांगले वाईट परिणाम यांची चर्चा घडून येईल. तसेच आधुनिक काळात आर्थिक प्रक्रिया कमालीच्या गुंतागुंतीच्या झालेल्या असताना, आर्थिक विकासासाठी काही महत्त्वाच्या नव्या प्रेरणा देखील या चर्चेतून मिळतील. त्यादृष्टीने वसाहतवादाच्या काळात अत्यंत खडतर कालखंड अनुभवलेल्या आणि आजही आर्थिकदृष्ट्या युरोपाशी स्पर्धा करू न शकणार्‍या, अनेक देशांना शिकण्यासारखे बरेच काही या संशोधनातून मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे आर्थिक विचारांचा इतिहास ही अर्थशास्त्रातील ज्ञानशाखा अनेक दृष्टीने महत्त्वाची असून, त्यातील संशोधन हे आर्थिक विकासाची धोरणे ठरवण्यासाठी आणि आर्थिक विकासाचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी बहुपयोगी ठरणार आहे, हेच यावर्षीच्या ‘नोबेल पुरस्कारा’ने अधोरेखित होते. म्हणूनच अर्थशास्त्रातील इतर तांत्रिक अभ्यासशाखा आणि आर्थिक विचारांचा इतिहास ही अभ्यासशाखा तुल्यबळच आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होताना दिसत आहे. या संशोधकांचा हा अभ्यास म्हणजे, वसाहतवादी राष्ट्रांची मानसिकता आणि त्यातून जगाच्या आर्थिक इतिहासावर आणि भविष्यावर झालेले दूरगामी परिणाम, यांचा आर्थिकदृष्टीने घेतलेला आढावा ठरतो. या वेगवान इतिहासपटाची झालेली उजळणी हे या ‘नोबेल पुरस्कारा’च्या मानकर्‍यांच्या यशाचे गमक आहे, असेच म्हणावे लागेल.

अपर्णा कुलकर्णी
7768027658
aparna.kulkarnixaviers.edu